Showing posts with label संदीप पाटील. Show all posts
Showing posts with label संदीप पाटील. Show all posts

12 June 2012

दादोजीचा पुतळा हटला : इतिहासाचे शुद्धीकरण.[पान २]

            सोन्याच्या नांगराने भुमी नांगरली. दादू कोंडदेवाने सोन्याच्या नांगराने भुमी नांगरली, हा इतिहास आहे आणि तो कसा बदलायचा , असा प्रश्नही काहीजनांना पडला आहे.पुण्यातील संशोधक पांडुरंग बलकवडे यांनी ७ जानेवरी २०११ च्या लोकप्रभा या साप्ताहिकात दादोजी पंती सिऊबांस शाहणे केले या मथळ्याखाली एक लेख लिहुन दादू कोंडदेव बद्दल शिवरायांस किती आदर होता, तो त्यांचा गुरु कसा होता, याची अनेक उदाहरणे दिली आहेत.पण त्यांनी दिलेल्या समकालीन पत्रांमध्ये शहाजी महाराज, शिवाजी महाराज, जिजामाता यांनी कुठेच दादू गुरु म्हणुन उल्लेख केलेला नाही हे मात्र स्पष्ट आहे. ज्या बखरी पेशवाईच्या उत्तराधार्त म्हणजे पळपुटा बाजीराव म्हणुन प्रसिद्ध असणार्या बाजीरावाच्या काळात किंवा त्याच्यानंतर लिहिल्या गेल्या.ज्या काळात ब्राह्मण - ब्राह्मणेत्तर वाद जोरात पेटलेला होता. तो इतका टोकाला गेला होता की पळपुट्या बाजीरावाने त्याला जेंव्हा मुलगा झाला तेंव्हा त्याचं नाव वामनराव ठेवलं. कारण त्याला वाटलं की हा वामन ब्राह्मणेत्तर बळीराजाला पुन्हा पाताळात गाडेल. पण हा वामन अल्पवयातच गेला आणि बाजीरावाचं स्वप्न अपुर्णच राहिलं.अशा काळातील अनेक चुकांनी भरलेल्या बखरींचा आधार घेऊन त्यांनी दादू ला शिवरायांचा गुरु करायचं योग्य नाही. कारण या  बखरींबद्दल इतिहास संशोधक सेतू माधवराव पगडी म्हणतात - मराठा साधनांपैकी एक्क्याण्णव कलमी बखर काय किंवा चिटणीस बखर काय, उत्तर पेशवाईतील असल्यामुळे भारूडांनी भरल्या आहेत.
           अशा बखरींमध्ये आलेला इतिहास हा आजपर्यंत होऊन गेलेल्या इतिहासकारांनी नाकारलेला आहे.एवढंच नव्हे तर पुण्याचे इतिहासकार मेहेंदळे ही या बखरीमधील इतिहास टाकाऊ व खोटा समजतात ( वाचा : राजाशिवछत्रपती प्रुष्ट : १००-११२)
               दादू कोंडदेवाने पुण्याच्या भुमीवर (पांढरी)  सोन्याचा नांगर धरला की नाही याचाही थोडासा मागावा घेऊ या. बलकवडे आपल्या उपरोक्त लेखात लिहितात -पुण्याच्या पांढरीवर सोन्याचा नांगर धरल्याचा उल्लेख फ़क्त सहा कलमी शकावलीत आहे.तीच्यातील शेवटच्या कलमातील तो उल्लेख असा आहे : शके १५५७ युव नाम संवत्छरी शाहजी राजे भोसले यांसि बारा हजार फ़ौजेची सरदारी इदलशाहीकडुन जाली सरजांमास मुलुक दिल्हे त्यात पुणे देश राज्याकडे दिलकहा राज्याची आपले तर्फ़ेने दादू कोंडदेव मलटणकर यांसि सुभा सांगुन पुणियात ठाणे गातले तेंव्हा सोहन्याचा नांगर पांढरीवर धरिला शांती केली मग सुभेदार याणी कसब्याची व गावगणाची प्रांतात वस्ती केली.
               पुण्याच्या पांढरीवर सोन्याचा नांगर धरला, असा उल्लेख असलेला हा एकमेव जुना कागद आतापर्यंत उजेडास आला आहे आणि त्यात दादू कोंडदेवचा स्पष्ट उल्लेख आहे.
            बलकवडे या शकावलीचं सहावं कलम अपुर्ण देतात. मुळात या शकावलीत लिहिलं आहे ... शके १५५७ युव नाम संवत्छरी शाहजी राजे भोसले यांसि बारा हजार फ़ौजची सरदारी इदलशाईकडुन जाली सरजांमास मुलुक दिल्हे.त्यांत पुणे देश राज्याकडे दिलकहा राज्यानी आपले तर्फ़ेने दादू कोंडदेव मलटणकर यांसि सुभा सांगुन पुणियास ठाणे गातले. तेंव्हा सोहन्याचा नांगर पांढरीवर धरीला. शांती केली मग सुभेदार याणी कसब्याची व गावगणाची प्रांतात वस्ती केली.कोल्याचे वषे दिल्हे.साहावे साली तनखा घेतला शाहजी राजे विज्यापूर प्रांती गेले. कलम १.
            बलकवडे या शकावलीतील शेवटचं एक वाक्यच्या वाक्यच गाळतात.कारण या वाक्यामुळे या कलमाचा स्पष्ट अर्थ समजुन येतो.साहावे साली तनखा घेतला शाहजी राजे विज्यापूर प्रांती गेले, हे वाक्य नसेल तर सोन्याची नांगर धरलेली घटना दादू कोंडदेव नी केली असं स्पष्ट होतं आणि शेवटचं वाक्य दिलं तर सोन्याचा नांगर शहाजी महाराजांनी स्वत:च धरल्याचं स्पष्ट होतं.वर दिलेली सहा कलमी शकावली ही ऐतिहासिक द्रुष्ट्या फ़ारशी विश्वसनीय नाही. तरीही या शकावलीतील इतिहास स्वीकारून निष्कर्ष काढायचा झाला तर सोन्याचा नांगर पुण्याच्या पांढरीवर धरला  असेलच तर तो शहाजी महाराजांनी धरल्याचं स्पष्ट होतं.
                 या सहा कलमी शकावलीतील उल्लेखावरून शिल्प करायचे झाले तर ते शहाजी महाराज सोन्याच्या नांगराने भुमी नांगरतात, आसे करायला पाहिजे. आणि सुसंगत तर्क म्हणुन त्यावेळी संभाजीराजे, बालशिवबा, व जिजाऊंना दाखवलं तर योग्य झालं असतं पण असं न करता पहिल्यांदा ऐतिहासिक साधनांचा अर्धवट उल्लेख करायचा. त्याच्या आधारावर असत्य गोष्ट सत्य म्हणुन ठासून सांगावयाची  आणि वेळवखत पाहून तशी शिल्प चित्र करावयाची या मागील कावा काय होता हे जेम्स लेनच्या पुस्तकाने जाहीर केलंय.
                 अशा या सोन्याच्या नांगराने भुमी नांगरणार्या समुहचित्राची मुळ कल्पना लढवण्याचा मान मात्र शिवशाहीर (?) बाबा पुरंदरे यांच्याकडे जातो. त्यांनी आपल्या राजाशिवछत्रपती व महाराज या पुस्तकात पहिल्यांदा अशा पद्धतीचं चित्र काढून घेऊन ती छापली.
           या चित्रांच्या आधारावरच १९९७-९८ मध्ये एक समुह शिल्प करून ते पुणे महानगरपालिकेने शनिवारवाड्याच्या मागे बांधलेल्या लालमहालात बसवायचं ठरवलं. त्यासाठी पुण्यातीलच संशोधक निनाद बेडेकर याच्या सल्ल्याने व मार्गदर्शनाखाली एक शिल्प तयार केलं गेलं. यामध्ये नांगरधारी बैलजोडी , बालशिवबा तो नांगर धरून, शेजारी थोडं वाकून बालशिवबाला नांगर धरायला शिकवणारे दादू कोंडदेव व शिवबांच्यामागे जिजाऊसाहेब असं शिल्प तयार झालं. हे शिल्प तयार करताना मात्र पुरंदरे ने काढून घेतलेल्या चित्रातही नाहीत  अशा जिजाऊसाहेबांना या शिल्पात आणलं गेलं.
          २००० मध्ये या शिल्पाचं अनावरण झालं. यासाठी छत्रपतींच्या वंशजांनाही बोलाविण्यात आलं.यात कोल्हापूरकर छ.शाहू  महाराज आणि सातारकर राजमाता सुमित्राराजे यांचा समावेश होता.शिवरायांचा कार्यक्रम म्हणुन या व्यक्ती हजर राहिल्या पण जेंव्हा इ.स. २००३ -०४ मध्ये जेम्स लेन चं पुस्तक प्रदर्शीत झालं आणि त्याने त्यातील दादू आणि रामदास संबंधाने जिजाऊंच्या चरित्राची विटंबना करणारे घाणेरडे उल्लेख समजले, तेंव्हा असे इतिहासाचा कोणतही पुरावा नसताना हे शिल्प का तयार केलं याचा उलगडा झाला. तेंव्हापासून या शिल्पातून दादू कोंडदेव काढावा अशी मागणी जोर धरू लागली. हे शिल्प चुकीच्या संदर्भावर तद्दन काल्पनिक व जिजाऊ, शिवराय, शहाजी महाराजांचा अपमान करणारं असल्यामुळे त्यात बदल करणं पुणे महानगरपालिकेला भाग पडल्याने २७-१२-२०१० रोजी दादू कोंडदेवाचा पुतळा काढावा लगला.
            असा हा पुतळा काढल्यामुळे इतिहास बदलत नाही तर इतिहासाचं शुद्धीकरण होतं त्यातील चुका दुरुस्त होतात हे आपण समजुन घेतलं पाहिजे. असंच इतिहासाचं शुद्धीकरण शिवपुत्र संभाजी महाराजांच्या बाबतीतही काही दशकापुर्वी इतिहास संशोधक वा.सी.बेंद्रे व डॉ.कमल गोखले यांनी केलं होतं. संभाजी महाराजांची उत्तरकालीन बखरकार,संशोधक, कादंबरीकार, लेखक यांनी केलेली बदनामी वरील संशोधकांनी अस्सल पुराव्यांच्या आधारे धुवून काढली होती.त्यावेळी त्यांनाही आज दादू चा पुतळा काढायला जशा काही प्रव्रुत्ती विरोध होत्या तसा विरोध झाला होता. पण आज शिवपुत्र संभाजी महाराजांचा कर्त्रुत्वशाली इतिहास सर्वांना मान्य झाला आहे.तसाच शिवचरित्रातील दादू कोंडदेव - रामदास शिवरायांचे गुरु नव्हते हा इतिहासही मान्य होईल, आणि तो मान्य करावाच लागेल.

दादोजीचा पुतळा हटला : इतिहासाचे शुद्धीकरण.

इंद्रजित सावंत (इतिहास अभासक)
१७ जानेवारी २०११
शिवाजीराजांचं पुण्यातलं वास्तव्य कुठे होतं ?शनिवारवाड्याच्या पिछाडीला असलेल्या लालमहालात दादू कोंडदेवच्या पुतळ्याने वादग्रस्त झालेल्या या लालमहालात शिवाजीराजे राहीले होते ? तिथेच शाहीस्तेखानाची बोटं छाटली का ? ठाऊक नाही ?!
मग, "रामदास किंवा दादू कोंडदेव हे शिवाजी राजांचे गुरु होते", ही क्लुप्ती ब्राह्मणांची आहे. असं छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज राजर्षी शाहू महाराज इ.स. १९२० मध्येच एका सनदेत लिहुन ठेवलं असलं तरी दादू - रामदास शिवरायांचे गुरु होते असं सांगणं - लिहिणं मात्र काही थांबलेलं नाही. उलट,नव्या जोमाने दादू कोंडदेवाचं नसलेलं कर्तृत्व मांडण्याची चढाओढ लागली.
          एवढंच नव्हे तर चित्र,शिल्पांच्या माध्यमातून ते शिवरायांचे पालक - गुरु होते हे असत्य जास्तच द्रुढ करण्याचा प्रयत्नही होत आहे. याचाच एक भाग म्हणुन लालमहालातील हे समुह शिल्प तयार झालं होतं.
            पुण्यातील शिवरायांचा लालमहाल म्हणुन आज दाखवली जाणारी वास्तू ही अलीकडच्या काळात म्हणजे १९८८ मध्ये बांधण्यात आलेली इमारत आहे.शिवाजी महाराज राहात होते तो मुळचा लालमहाल आज अस्तित्वातच नाही.असं असलं तरी शिवरायांच्या लालमहालाविषयी अनेक संदर्भ आपल्याला इतिहासाच्या कागदपत्रातून मिळतात. यातील सर्वात विश्वसनीय पुरावा म्हणजे जेधे करीन्यात आलेला आहे.यात म्हंटलं आहे- "१५१५ शोभक्रुत संवछरी चैन शुध अष्टमी रविवारी लोकाची निवडी करून पुणियात राजश्री स्वामींनी खासा दाहा लोकानसी लाल महालात जाऊन शास्ताखानाकरवी छापा घातला बा कान्होजी ना यांचे पुत्र चांदजी जेधे होते मारामारी झाली.तेंव्हा शास्ताखानाचा हात तुटला.मग पळोन गेला.त्याचा लेक अबदुल फ़ते ठार झाला. त्याउपरी स्वामी परसातील दिंडीने बाहीर निघाले.तो सर्जाभाऊ जेधे घोडियावरी बैसोन पागेचा घोडा दुसरा खासदाराजवल देऊन दिंडी समीप आज्ञाप्रमाणे राहीले होते.राजश्री स्वामी येताच घोडियावरी बैसोन मुळा उतरोन जरेसाकडे निघाले.जागाजागा लस्कराच्या टोळ्या व करणे नगारे ठेविले होते.त्याची गुली मोगलाच्या लस्करात जाली.राजश्री स्वामी हशमाच्या व लष्कराच्या जमावानसी दुसरे दिवसी सिहगडास आले.शास्ताखान कुच करुन गेला."(या मजकुरात पुर्णविराम वाचण्याच्या सोयीसाठी दिले आहे,मुळ मजकुर मोडी लिपित आहे.त्यात स्वल्प-अर्ध-पुर्ण विराम नाही त्यामुळे संदर्भ देताना अडचणिचा मजकुर गाळला जातो. त्याचा दाखला पुढे आहेच)
           करीन्यातील या उल्लेखावरून हा महाल पुण्यात मुळा नदिच्या जवळ होता व त्यास लालमहाल हे नाव शिवकाळात मिळालं होतं. हे समजुन येतं. यानंतरचा या महालाचा उल्लेख एका शकावलीत आला असून ही शकावलीतील नोंद पेशवे दफ़्तरातून निवडलेले कागद खंड २२ मध्ये लेख नं.२९२ वर छापलेली आहे.यावर या कगदाची तारीख २८-०६-१७३५ अशी दिली आहे. या नोंदीत म्हंटले आहे - "आश्याढ वद्ये ४ सुक्रवारी पंतप्रधान यांणी राजश्री सिवाजी राजे यांचा मालमहाल राजश्री दादाजी कोंडदेऊ याणी राजश्री शाहाजी राजे याचे कारकीर्दीस बांधला होता.त्यांचे भाऊ राजश्री संभाजी राजे सिवाजी राजे याचे भाऊ त्याचा महाल वेदमूर्ती राजश्री खंडभट शालेग्राम याच्या वाडियापावेतो होता. त्याचे जोते उतरामुख होते. ते उखळुन चिरे कारंजियापासी घर बांधले त्याजला जोतीयास नेले.राजश्रीच्या माहालावरही येक दोन घरे बांधोन अबदार वाडा करून ठेवावा. तुर्त एक दोन घरे बांधली, माहलात नेहमी घरे रहावयास होतील म्हणुन पंती लालमहाल बांधायची तजवीज केली.आठरापंधरा रोज झाले. जुना हौद कारंजियाचा पका आहे, त्यावरती पछेकेमडे दिवाणखाणा जुना होता तेथे घर बांधिले त्यास यांची साधत नाही त्या दिवाणखानियाची जुनी काहीवाही भिंताडे होती ते धोंडे काहडुन आपल्या वाडियाच्या सुताने दोरी धरून प्रांची साधून कारंजियाचा सुमार टाकून तुर्त येक घर कारंजियाच्या कोनासी दक्षणेकडल्या लाऊन (?) केले होता. मुळे हे कारंजे रद जाले असे.देसपांडियाच्या पछमेस खंडभटाने दक्षणेस जे जागा आहे ते आजी पंती उखळुन चिरे हाऊदाकडे नेऊन तुर्त घर बांधतात.त्याच्या जोतियास लाविले असेत.लालमाहलाचा वगैरे दोन यैस तीन आठ पंती गाडले होते ते उकरिले. पाणी लागले. म-हामती तोडाची केली असे.लालमाहालाची जमीन पछमेसहि काही गेली असावीसी आहे. तुर्त जोते काहडलियाने माहालचे हादेचे हिंदाने मोडले; परंतु ते जागा महालाची असे"
         वरील उल्लेख हा महत्वाचा असून यातील माहीतीवरून हा महाल शहाजी महाराजांच्या कारकीर्दित दादू कोंडदेवनं बांधल्याचं नोंदवलं आहे.पण यामध्ये कुठेही दादु शिवरायांचा गुरु असं म्हंटलेलं नाही. त्यावरून इ.स.१७३५ पर्यंत तरी दादू हा शिवरायांचा गुरु होता, असा प्रवाद रुढ झाला नव्हता, हे स्पष्ट होतं.
             एवढंच नाहीतर, या लालमहालासोबत शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ बंधू संभाजी महाराजांचा वाडाही या लालमहालाच्या शेजारी होता, हे समजुन येतं. हा संभाजी महाराजांचा वाडा व लालमहाल पंती म्हणजे पंतप्रधान उर्फ़ पेशव्यांनी पाडुन त्या बांधकामातील दगडाचे चिरे व जागा आपला वाडा बांधण्यासाठी वापरले होते.या लालमहालात कमीत कमी तीन पाण्याचे आड (विहिरी) होते.मोठा दिवाणखाना होता.पाण्याचे हौद व कारंजे होते, हेही वरील उल्लेखावरून स्पष्ट होतं.
         म्हणजे शिवरायांचा मुळचा लालमहाल अलीकडचा लालमहाल दिसतो तेवढा लहान निश्चितच नव्हता.कारण इ.स.१६६१-६३ शायिस्तेखानाने जेंव्हा पुण्यात मुक्काम ठोकला होता, तेंव्हा त्याने आपलं निवासस्थान म्हणुन या शिवरायांच्याच वाड्याची निवड केली होती.ज्यावेळी शिवरायांनी शायिस्तेखानावर छापा टाकला, त्यावेळी मुघली इतिहासकार भिमसेना सक्सेना व ख्वाफ़ीखानाने केलेली वर्णने उपलब्ध आहेत. या वर्णनांवरूनही लालमहालाची भव्यता समजून येतं.
             या वर्णानांवरून या वाड्याला मोठा नगारखाना होता.शिवाय या वाड्यात पाण्याचे हौद होते.भली मोठी बाग होती.या बागेला "राजबाग" असं म्हणत असत.या बागेच्या देखभालीचं काम महाराजांनी मोतमाळी दरवडा याला दिलं होतं. पुढे शायिस्तेखानावर छापा टाकला, त्यावेळी या माळ्यांनी शिवरायांना माहिती देऊन मदत केल्याचा उल्लेखही मिळुन येतो.
            असा हा शिवरायांच्या महालाचा काही भाग जरी पेशव्यांनी पाडला असला तरी या भल्या  मोठ्या महालाचा काही भाग इंग्रज आमदनीपर्यंत शिल्लक होता त्या भागास अंबरखाना म्हणुन ओळखलं जात असे.याची नोंद इ.स.१८८५ च्या बोम्बे प्रेसिडेंसी ग्याझेटीअरमध्ये आली आहे.(बोम्बे ग्याझेटीयर प्रेसिडेंसी व्होल्यूम १९ भाग ३ पुना)
              असा हा शिवरायांचा भव्य लालमहाल पेशव्यांनी पाडल्यामुळे आज अस्तित्वात नाही. हा महाल शहाजी महाराजांनी बांधून घेतला व या महालात शिवाजी महाराज, जिजामाता, संभाजी महाराज, शहाजी महाराज यांचं वास्तव्य अनेक वर्षे झलं होतं. 
               लालमहाल नेमका कधी बांधला याचा उल्लेख अजुन पर्यंत उजेडात आलेला नाही. पण इ.स. १६४२ नंतर शिवराय जेंव्हा बंगरुळवरुन पुण्यास आले तेंव्हा त्यांचं वास्तव्य काही काळ म्हणजे इ.स.१६४९ पर्यंत तरी खेडमध्ये बांधलेल्या वाड्यात होतं. हे निश्चित. शिवाजी महाराज इ.स. १६४२ मध्ये पुणे जहागिरीवर आले तेंव्हा पहिल्यांदा ते खेड मध्ये आले. तेथे त्यांच्यासाठी एक वाडा बांधण्यात आला पुढे हा वाडा बांधण्यासाठी काही लोकांची घरे पाडण्यात आली. त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी खेडजवळच एक पेठ बसविण्यात आली. या पेठेला शिवापुर असं नाव देण्यात आलं. या गावाजवळच कामथाडी इथे जिजाऊंची शेती होती.या शेतीसाठी शिवगंगानदीवर दगडाचे बांधही घालण्यात आले होते. ते आजही पहावयास मिळतात. पण शिवरायांचा वाडा खेडमध्ये नेमका कुठे होता याचा शोध घेणं बाकी आहे.
               १६४९ नंतर जिजामाता व शिवाजी महाराज पुण्यात रहावयास आले.त्यावेळी काही काळ ते पुण्यातील झांबरे पाटलांच्या वाड्यात राहीले होते.(पुढे याच झांबरे पाटलांकडुन जागा विकत घेऊन त्या जागेवर ललमहाल बांधला.) म्हणजे तोपर्यंत तरी लालमहाल व संभाजी महाराजांचा महाल बांधुन पुर्ण झाला नव्हता, हे समजुन येतं. पुढे लालमहाल बांधुन पुर्ण झाल्यावर शिवराय व जिजामाता या महालात राहावयास आल्या.
                 शिवरायांच्या वास्तव्याची इतकी सविस्तर माहीती देण्याचं कारण; आज ज्या लालमहालातील दादू कोंडदेवच्या पुतळ्याचा विषय पुण्यातील काही संशोधक व त्यांचे पाठीराखे धरत आहेत.त्यांना हे माहीत व्हावं की ज्यावेळी शिवराय लालमहालात राहावयास आले, त्याच्या खुपच अगोदर म्हणजे दोन-तीन वर्षापुर्वी दादू कोंडदेवाचा म्रुत्यु झाला होता.अशा व्यक्तीचा पुतळा त्या ठिकाणी बसवावा म्हणुन आग्रह धरणे, हे कोणत्याही तर्कशास्त्रात बसत नाही.त्यामुळे लालमहालातील बाल शिवबा, जिजामाता आणि दादू कोंडदेवाचं समुह शिल्प हे इतिहासाच्या अडाणीपणातून उभं राहिलं हे सिद्ध होतं.